![]() |
पूर्ण नाव | बाजीराव बाळाजी (उर्फ बल्लाळ) भट (पेशवे) | |
पदव्या | श्रीमंत | |
जन्म | ऑगस्ट १८, १६९९ | |
मृत्यू | एप्रिल २५, १७४० | |
रावेरखेद | ||
पूर्वाधिकारी | बाळाजी विश्वनाथ | |
उत्तराधिकारी | बाळाजी बाजीराव पेशवे (नानासाहेब पेशवे) | |
वडील | बाळाजी विश्वनाथ | |
आई | राधाबाई | |
पत्नी | काशीबाई | |
इतर पत्नी | मस्तानी | |
संतती | बाळाजी बाजीराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, जनार्दन, समशेरबहादूर |
थोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, १६९९ - एप्रिल २५, १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या. जेव्हा छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्यासमोर हतबल झाले, तेव्हा त्यांनी गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देउन बाजीरावांना गुप्त पत्र लिहिले. अर्थात बाजीरावांनी तिथेही आपल्या तलवारीची किर्ती कायम ठेवली. त्याची परतफेड म्हणून छत्रसाल बुंदेला यांनी ३लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भूभाग बाजीरावांना नजर केला. शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी "मस्तानी" त्यांना दिली.
बाळाजीच्या मृत्यूनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासून ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता, ते वर्चस्व पुन:प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के-कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. थोरल्या बाजीरावांची मुद्रा -
॥श्री राजा शाहु नरपती हर्ष निधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान ॥
बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे.
पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्ला बांधून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" याने छत्रसाल बुंदेलावर आक्रमण केले. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजीरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.
या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील.
या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला.
चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण घाट आणि किनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणीव ठेऊन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदीर बांधले.
बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४० (वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा