मुघल सत्ता ढासळत असताना इ.स. १७५६-इ.स. १७५७ मध्ये अफगाणिस्तानच्या अहमदशाह अब्दाली याने दिल्ली ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात जानेवारी १३, इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणुन ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहिही मिळाले नाही. इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणुन मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. दुसर्या आंग्ल-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओरिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले. तिसर्या आंग्ल-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणुन सामिल झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा